रात्रीचा काळाकिट्ट अंधार, सुनसान रस्ता... रस्त्यावरून धावणाऱ्या गाडीचे हेडलाईट अचानक बंद होतात... गाडी मध्येच थांबलेली... आसपास कोणी नाही... समोर बाभळीचं एक वाळलेलं झाड... वाऱ्यानं हलणाऱ्या या झाडांच्या फांद्यांतून भेसूर आवाज बाहेर निघत होता... असं काहीसं चित्रण लहानपणी गोष्टींमधून ऐकलं होतं. म्हणजे काय की, प्रत्येकाच्याच
मनात रात्रीविषयी काहीतरी भीतीदायक असं साठवलेलं असतं. या भीतीला अपवाद असणारे बरेच जण असतील पण सध्या तरी गाडीत मी आणि अफरोज होतो. प्रवासात सोबतीला होती
अंधारलेली पण मनमोहक रात्र... अशाच या रात्रींबद्दल थोडंसं
साब... रातमें निकले तो अच्छा है. रास्ता जल्दी कटता और ट्राफिक भी नही पडता... दुपारी फोनवरून बोलत असताना अफरोज सांगत होता. झालं काय, की सांगलीला जायचं म्हणून
मी याची गाडी घेऊन जाणार होतो. त्यानं सांगितल्यानुसार रात्रीच आम्ही प्रवासाला निघालो. फक्त काही तास थांबून लगेचच निघायचं असल्यानं गाडीत मी आणि अफरोज दोघेच होतो.
अफरोज हा माझ्या मित्राचा लहान भाऊ. जातानाच्या प्रवासात रात्री निघण्याचा किती फायदा होतो, हे तो मला सांगत होता. त्याच्या बोलण्याला अधूनमधून ‘हाँ ना भाई... सही है ना
भाई’ असं म्हणून मी दुजोरा देत होतो.
पण मनात मात्र वेगळंच काही सुरू होतं. रात्रीचा काळाकिट्ट अंधार, सुनसान रस्ता... रस्त्यावरून धावणाऱ्या गाडीचे हेडलाईट अचानक बंद होतात... गाडी मध्येच थांबलेली...आसपास कोणी नाही... समोर बाभळीचं एक वाळलेलं झाड... वाऱ्यानं हलणाऱ्या या झाडांच्या फांद्यांतून भेसूर आवाज बाहेर निघत होता... असं काहीसं रात्रीचं चित्रण लहानपणी गोष्टींमधून ऐकलं होतं. म्हणजे काय की, प्रत्येकाच्याच मनात रात्रीविषयी काहीतरी भीतीदायक असं साठवलेलं असतं. या भीतीला अपवाद असणारे बरेच जण असतील; पण सध्यातरी गाडीतला मी आणि अफरोज दोघेही रात्रप्रेमी होतो, हे निश्चित.
बोलता - बोलता सहजच विचार आला, रात्री एवढ्या वाईट असतात काय? खरेतर उषा आणि निशा या दोघी बहिणी. पण सकाळ रमणीय, तर रात्र भयंकर. पहाटेची वेळ ऊर्जादायक
असते हे खरे; पण रात्रही तेवढीच सुंदर असते. नोकरी आणि कामाच्या ओघात अनेकांच्या नशिबी ‘जगने की रात’ येते. सध्याच्या बदललेल्या या जमान्यात तर या दोन्हींमध्ये
कुठलाही फरक करता येणार नाही. पण रात्रीची झोप ज्यांच्या नशिबी नाही असे कितीतरी लोक आपल्या आसपास वावरत असतात. मीडियामधील लोक, हॉटेलचे स्टाफ वर्कर, एटीएम,ऑफिस, बँका, कंपन्यांची रखवालदारी करणारे वॉचमन, कंपनीतील रात्रपाळीचे कामगार या सगळ्यांचे घड्याळ निराळेच असते. त्यांना ते पुरते सूटही झालेले असते. त्यामुळेच हायवेवरून जाताना रात्रीच्या वेळी काही मिळत नाही, असे होत नाही. हा अनुभव सर्वांचाच. रस्त्यावर एखादी गाडी थांबली की हॉटेल, ढाब्यावरील लोक तेवढ्याच तत्परतेनं पुढे येऊन काय हवंय ते विचारतात. मुख्य शहर जरी झोपलेले असले तरी हायवेवरचे हे ‘नाईट किंग’ अगदी अडीच-तीन वाजताही फ्रेश असतात. त्यामुळे पहाटेची वेळ अनुभवण्याचा प्रसंग त्यांच्यावर फारसा येत नाही. पण रात्रीशी मात्र या सगळ्यांचीच दोस्ती झालेली असते. सध्याच्या व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या दुनियेत तर अशांची संख्या खूप वाढतेय. स्मार्टफोन जसा प्रत्येकाच्या हाती आला, तशी जागरणं करणाऱ्यांची संख्याही वाढलीय. शहरातली रात्र अंधारलेली नसते बहुदा; पण रसिकतेनं अनुभवली तर रात्रही नितांतसुंदर असते. सौंदर्य हे त्या त्या वस्तूत नव्हे, तर माणसाच्या नजरेत सामावलेलं असतं. समाजाच्या जडणघडणीत जसे अनेक कंगोरे असतात, तसेच माणसातही. त्यामुळे रात्र आणि पहाट यात डावं-उजवं करणं खरेतर अन्यायकारक ठरेल. रात्रीची निरव शांतता अनुभवली तरच तिच्यातलं सौंदर्यही ध्यानात येईल. घरातले सर्वजण झोपल्यावर भिंतीवर अडकवलेल्या घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येते. दिवसभरात मात्र आपलं लक्ष फक्त घड्याळाच्या धावणाऱ्या काट्याकडं असतं. या काट्यांचा आवाज ऐकू येतो रात्रीच.
हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अशी अनेक गाणी सापडतील जी रात्रीविषयी बोलतात. ‘ये रातें नयी पुरानी...’सारखं गाणं ऐकलं तर ते ध्यानात येईल. नव्वदच्या दशकात सुपरहिट झालेलं
एक गाणं तर केवळ रात्री फिरणाऱ्यांवर आधारलेलं होतं. ...तर सांगलीच्या दिशेनं धावणाऱ्या आमच्या गाडीत होतो फक्त आम्ही दोघे. अफरोजशी जसजसं बोलत गेलो, तसतसं त्याच्या ध्यानी येत गेलं की, साहब को भी रातें पसंद है. अफरोज म्हणालाही... साब तुम मेरेको पहलेच बोलना था. आजकल क्या है की रातको निकलनेंका बोले तो लोगा डरते... रात्री-अपरात्री घडणाऱ्या गुन्हेगारी, लूटमार, वाटमारीच्या वाढत्या घटना पाहता, लोकाचंही बरोबरच होतं. पण आम्हा दोघा रात्रप्रेमींना मात्र असा कुठलाही धाक वाटत नव्हता. पण तरीही रात्री प्रवास करताना प्रत्येकानं काळजी घ्यायलाच हवी. काय सांगता कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल ते...
रात्रींबद्दलची ही भावना आता बऱ्यापैकी बदलताना दिसते आहे. पहाटे उठून मी खूप अभ्यास केला, त्यामुळेच मी हे यश मिळवू शकलो, असं यशाचं गुपित सांगणारे जसे अनेक आहेत,
तसेच रात्र-रात्र जागून अभ्यास करणारेही अनेक विद्यार्थी असतात. ज्याला त्याला जे जे काही सूट होते ते ते तो करीत असतो. यात वेळ महत्त्वाची नसून केलेले परिश्रम, घेतलेली अखंड
मेहनत महत्त्वाची ठरते. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर यशाचा ध्यास घ्यावा लागतो. हा ध्यास एकदा डोक्यात घुसला की, माणसाला दिवस कळतो ना रात्र. अथक मेहनतीनं तो
त्याच्या ध्येयाच्या मागे सारखा धावत असतो. यशस्वी झालेले अनेक जण जेव्हा बोलते होतात, तेव्हा त्यांनी दिवसरात्र घेतलेली मेहनत जगासमोर येते. त्यामुळे शेवटी सांगायचं काय
की,
रात सारी आपुली,
दिवसही आपला
खूप मेहनत कर मित्रा
तेव्हा जाशील टॉपला...