गाव तसं छोटंसं... पण गावकरी भलतेच दर्दी. कुठलाही कार्यक्रम करायचा तर तो एकजुटीनं, ही गावातल्याच लोकांनी लावलेली शिस्त. श्रावणात येणाऱ्या सणवारांच्या निमित्तानं गावकऱ्यांच्या अंगात उत्साह शिरलेला... नागपंचमी तोंडावर आलीय म्हणून एका मोठ्या झाडावर झोका बांधून ठेवला होता. उत्साह असा की, सगळी तयारी महिना-पंधरा दिवस आधीपासूनच. गावच्या युवावर्गात असा उत्साह असला तरी बडेबुजुर्ग मात्र धोरणी होते. झोका खेळायला जाण्यासाठी हट्ट करणाऱ्या चंदीला मावशीनं मात्र रोखलं होतं. का... तर झोक्यावर ‘तो’पण असंल... कोरोनासुर.
भारतीय माणूस आणि सेलिब्रेशन याचं एक गणित पक्कं जुळलेलं आहे. त्यामुळेच की काय, संपूर्ण वर्षभरात अगदी जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत अनेक सण-उत्सव, वार-त्यौहार यांचं एक प्लॅनिंग केलेलं असतं. बऱ्याच वेळा ते ठरलेलं असतं. यंदाच्या वर्षी अगदी गुढीपाडव्यापासून सणवारांना जी ‘घरातल्या घरात’ साजरे करण्याची कळा कोरोनामुळे लागली ती आजही तशीच आहे. श्रावण महिना तोंडावर आहे. मोठमोठ्या सण-उत्सवांची सुरवात श्रावणापासून होते. भारतीय संस्कृतीमध्ये केवळ देव-देवताच नाही, तर झाडे, पशु-पक्षी, त्यांचे माणसाच्या जीवनातील योगदान आणि माणसाने त्यांच्याप्रती दाखविलेला कृतज्ञता भाव या सगळ्याच बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. वटसावित्री पौर्णिमा, नागपंचमी, पोळा, बलिप्रतिपदा आदी सण उत्साहाने सगळीकडे साजरे होतात. अगदी गटारी अमावास्याही आपल्याकडे सेलिब्रेशनचा पॉइंट ठरलेला आहे. श्रावणापासून पुढे वेध लागतात गणेशोत्सवाचे. युवाशक्तीच्या कौशल्याला आव्हान देणारी दहीहंडी येते. दांडियाच्या तालावर थिरकणारी तरुणाई पाहायची तर गरबा उत्सवात. नवरात्रीचा हा सण सर्वांना आवडणारा. पण पुन्हा तेच... घरातल्या घरात. कोरोनासुराची भीती... सण-उत्सवांच्या या मालिकेचा शेवट होतो दीपावलीने. बघूयात तोपर्यंत काय काय होतं ते...
यंदाच्या वर्षी वरुणराजा धो धो बरसत आहे. पावसाळ्याच्या फक्त दोनच महिन्यांत ‘पाणीच पाणी चहुकडे’ असे चित्र दिसते. गावोगावच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. ओढ्यांना पाणी आलेय. काही शेतांमध्ये तर विहिरी गच्च भरल्या आहेत. पावसानं एकीकडे सगळी सृष्टी आबादानी केली असली तरी शेतकऱ्यांची तारांबळ मात्र वाढवली. काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी सुरवातीला पेरलेलं वाहून गेलं. पावसानं शेतातले बी-बियाणे तर वाहून नेलेच, मातीही खरवडून गेली. काही भागांत एवढं पाणी साचलं की आता निचरा केव्हा होईल याची शेतकरी वाट पाहतोय. निसर्गानं अडचणीत आणलं, तर त्यातून बाहेर काढण्याची योजनाही त्यानं बनविली असेल, अशी आशा करूयात. चिंता नको... सगळे काही व्यवस्थित होईल.
हिरवागार झालेला निसर्ग, खळाळणारे धबधबे, पक्ष्यांचे मधुर आवाज... हे सगळे घेऊन येणारा श्रावण. गावातील एखाद्या मोठ्या झाडावर उंच बांधलेला झोका नागपंचमीची आठवण करून देतो. श्रावणाला अनुसरून अनेक गाणी आजवर चित्रपटांमध्ये आली आहेत. त्यातलंच एक नितांत सुंदर असं गीत... १९७९ मध्ये आलेल्या ‘जुर्माना’ चित्रपटातील. गाण्याचे बोल असे आहेत... ‘‘सावन के झूले पडे... तुम चले आओ...’’ पण आता या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्याला वेगळ्या पद्धतीने म्हणावं लागतंय.
‘‘सावन के झूले पडे...
कोरोना, तुम चले जाओ... ’’
.jpg)